सकाळ वृत्तसेवा
Friday, December 11, 2009 AT 12:00 AM (IST)
चंद्रपूर - शहरातील मालधक्क्यावरून चढ-उतार बंद करण्यात यावे, या मागणीसाठी अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेल्या इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील "आयसीयू'मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी इको-प्रोच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले.
मध्यवर्ती भागातील रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या मालधक्क्यामुळे शहरात प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आर्यन ओव्हर आणि सिमेंटची होणारी चढ-उतार बंद करून मालधक्का स्थलांतरित करण्यात यावा, यासाठी पाच डिसेंबरपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महायज्ञ आणि सामूहिक मुंडण करण्यात आले. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने धोतरे यांची तपासणी केली. यावेळी त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. आज (ता. 10) सकाळी त्यांना जनरल वॉर्डातून अतिदक्षता (आयसीयू) विभागात स्थलांतरित करण्यात आले. उपोषण मंडपात त्यांच्याजागी गौरव गौतम, अनिल अडगुरवार बसले आहेत. बुधवारी सायंकाळी इको-प्रोच्या एका शिष्टमंडळाने नागपूर येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन अन्नत्याग सत्याग्रहाची माहिती देऊन मागण्यांचे निवेदन दिले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात धर्मेंद्र लुणावत, संदीप इंगोले, नरेश केवटे, संजय कन्नावार, अब्दुल जावेद यांचा समावेश होता.
या सत्याग्रहाला विविध संघटनांचा समर्थनार्थ पाठिंबा मिळत असून, ओघ सुरूच आहे. पुणे येथील पर्यावरण प्रथम, चंद्रपुरातील रोटरी क्लब, चंद्रपूर नागरिक मंच, रेल सुविधा संघर्ष समिती, चंद्रपूर व्यापारी मंडळ, महाराष्ट्र डेबुजी फोर्स, शहर शिवसेना, बजरंग दल, महाराष्ट्र कुंभार महासंघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, ऑटो-चालक मालक संघटना, भीमशक्ती ऑटोचालक-मालक संघटना, विदर्भ ऑटोरिक्षा चालक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, प्रयास संघटना, जागृती युवा मंडळ, जिल्हा मास्टर ऍथलेटिक्स, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, चंद्रपूर शहर पत्रकार संघ, ऑल इंडिया ऍन्टिकरप्शन दिल्ली, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ट्रिम इंडिया प्रा. लि., आदी संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे.
धाबा येथे महायज्ञप्रदूषणविरोधात अन्नत्याग सत्याग्रह करीत असलेल्या बंडू धोतरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि जिल्हा प्रशासनाला सुबुद्धी मिळावी, यासाठी धाबा येथे इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी संत कोंडय्या देवस्थानात महायज्ञ केला. महंत तुळशीराम महाराज शेगमवार यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर गोंडपिंपरी येथील नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी नीलेश झाडे, दीपक वांढरे, समीर निमगडे, लोकमित्र समर्थ, सचिन फुलझेले, बाळू निमगडे, प्रमोद रामगिरवार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ परतलेमालधक्क्यावरील आर्यन ओव्हरची वाहतूक बंद करीत असून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला बंडू धोतरे यांच्या अटळ भूमिकेमुळे परत जावे लागले. दुपारी दीड वाजता चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर, वरोऱ्याचे उपविभागीय अधिकारी काळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पराग मणेरे यांनी धोतरे यांची भेट घेतली. मात्र, इतर मागण्यांसंदर्भात प्रशासनाने कोणतीही भूमिका न घेतल्याने उपोषण कायम ठेवण्यावर धोतरे ठाम राहिले.
0 comments: